Aamhi ShabdaBhramar

Sunday, September 09, 2007

प्रेम

तू प्रेम केलस
पण माझ्यावर नव्हे
तर स्वतःच्या प्रेमावर

वेळप्रसंगी
ते सिद्ध करण्यासाठी
जगावेगळा वागलास
उपाशी राहीलास
रात्र रात्र जागलास
माझ्या मागे भागलास

पण..
मला
माझ्या भावनांसकट
गृहित धरत गेलास

~ तुषार जोशी, नागपूर

(कापी पेस्ट करणा-या सर्व वीरांना अशी विनंती आहे की आपण काव्य रसिक आहोत याची जाणीव असू द्या आणि कवितेसकट मूळ लेखकाचे नाव पण लिहित चला. कवितेचा प्रसार नक्की करा पण त्याच्या कवि सकट करा हेच साहित्याचा आदर करणे आहे व आपल्या रसिकतेचा मान राखणे आहे)

Monday, May 29, 2006

आला पाऊस

पाऊस काल सांगून गेला येऊन माझ्या स्वप्नात,
तयार हो स्वागताला येतोय मोठ्या थाटात
तू मात्र यंदा काही लिहायाचे नाही
कागदावरच्या शब्दांनाही मुळीच भिजायाचे नाही

पडेल मी तू सांगेन तेव्हा तिला भेटताना
विजही तुला भेटून जाईन, जरा मने जुळताना
तू मात्र यंदा तेथेच थांबायाचे नाही
वार्यावरल्या मृद्गंधाला नुसतेच वाहायचे नाही

मला आवडतो पाऊस असे सांगेन ती तुला
होईन दूर मी तेव्हा इंद्रधनु दावण्या तुम्हाला
तू मात्र यंदा एकटे राहायाचे नाही
तुझ्या पाखराला नक्की सांगायाचे काही

सरेन नंतर नेह्मीसारखाच काम पूर्ण करून
भेटत राहीन तुम्हाला तुमचेच प्रेम बनून
तू मात्र मला विसरायाचे नाही
शब्दामधून स्वप्ने मात्र फुलवायची यंदाही
-
केतन

Friday, April 21, 2006

चोचले (गझल)



पुरवले मी काळजाचे चोचले
तेवढ्यापुरतेच ते संकोचले!

वैर त्यांचे लाघवी आहे खरे
दुःखही माझे तयांना बोचले

बाब आहे काळजीची केवढी!
भक्त गाभाऱ्यात कैसे पोचले?

हाय! काटे कोवळे होते किती!
पाकळ्यांना बोट माझे टोचले

काय सांगू ऐट 'साहेबास' मी?
आंधळ्यांनी फक्त सदरे खोचले

-नीलहंस

Tuesday, April 11, 2006

सुकलेली फुले

-
सुकलेली फुले वहीच्या पानामध्ये
आठवणी मात्र ताज्या,मनामध्ये ।

जपून ठेव वही सुकलेल्या फुलांची
पण झटक धूळ जुन्या आठवणींची ।

नव्या ऋतूत नवी फुले उमलतात
सुकलेल्या फुलात मने अडकतात ।

वहीतल्या फुलांना विसरू नको
पण बहरल्या फुलांना मुकू नको ।

नव्या फुलांचा सुगंध घेत जा
वहीत ठेवणे मात्र टाळत जा ।

कारण वहीत उरतात सुकलेली फुले
आणि झाडांवर बहरतात नव्याने फुले ।

-प्रणव

Saturday, April 08, 2006

बंडखोर -(गझल)

बंडखोर (गझल)

जोडून हात बसले माझ्यासमोर काही
अभिषेक,दान,पूजा करतात चोर काही

बाहेर नाचणारा पाऊस भाववेडा
अन आत पिंजऱ्याच्या रडतात मोर काही

चोरून चंद्र आम्ही झालो पसार जेव्हा
तेव्हा खुळ्या जगाला दिसले चकोर काही

होतो जपून प्रेमे डोळ्यात मी तरीही
वाहून आसवे का गेली मुजोर काही?

घालून धावदोरा आयुष्य जोडताना
सलगी कशी गळ्याशी करतात दोर काही?

तोंडात लेखणीच्या शाई बरीच आहे
( शब्दांत भाव भिजले मिंधे,छचोर काही )

केलास व्यर्थ, कृष्णा! उपदेश अर्जुनाला
सत्संग मांडणारे आहेत 'थोर' काही

सौद्यास दैव आले दारी अखेर माझ्या
हातात फक्त पडले क्षण बंडखोर काही

-नीलहंस

Sunday, March 26, 2006

कधी वाटते..

आज वाटते फुल फुलावे
तुझीया कोमल ओठांचे ,

कधी वाटते प्राषून घ्यावे
टिपूर चांदणे तूझ्या रूपाचे..

मुक्त फिरावे पाखरू चंचल
तुझीया दोन नयनांचे...

स्वर घुमावे कानी अवचित
तुझीया सुरेल कंठाचे..

अशीच व्हावी संगत गंधीत
तुझीया जवळ असण्याने

अन

असेच गावे गीत सुरातच
तुझीया माझ्या प्रीतीचे....

... प्रज्ञा

Saturday, March 25, 2006

तूही नाही... - गझल

तूही नाही..

अव्यक्त माझे भाव अन् बोलणार तूही नाही !
दडवलय मी हे गुपित अन् खोलणार तूही नाही !

रमणीय सृष्टी,रंगली मैफल स्वर्गीय सुरांची !
निश्चल मी तरी अन् डोलणार तूही नाही !

लपवूनि अर्थ गहिरे; उधळले शब्द सारे !
न मोजले मी कधी अन् तोलणार तूही नाही !

भरलेला समोर हा प्याला; साखर सर्व तळाला !
प्यालो मी तसाच् अन् घोळणार तूही नाही !

हा अबोल दूरावा भासे जणु वैषाखाचा वणवा !
थंड आहे मी तरी अन् पोळणार तूही नाही !

क्षणोक्षणी तुझेच् स्मरण; आलो कधी चुकून समोर..
नजर मी चुकवेन; अन् ओळखणार तूही नाही !

-परीक्षित

Friday, December 23, 2005

सायुज्यता

तुझ्या मनी विचारांचे काहूर माजता
त्याचे पडसाद दिसती माझ्या मुखावर

तुझ्या श्वासां-श्वासांत असे माझा प्राणवायु
तुझे हे जगणे करे मला दिर्घायु

माझ्या मनी विचारांची खळबळ माजता
तुझ्या मुखातुन झिरपते माझीच कविता

तुझ्या आनंदात माझे स्मित दडे
तुझ्या प्रसन्नतेत माझा उत्साह ओसंडे

तुला वाटते दोन देहांची गरज न काही
भार एकाचाही मज सहन होत नाही
- विश्वेश

कळलेच नाही!!!

कळलेच नाही!!!
चाफ्याच्या फुलांच्या कधी झाल्या मुंडावळ्याकळलेच नाही!!!
आंब्याच्या तळ्यांचे कधी झाले मांडव डहाळे ... कळलेच नाही
माजघरातल्या अंधारात कधी लागले डोहाळे..... कळलेच नाही
चिंचेची बोरांची कधी लागली जिभेला शिरशिरी.. कळलेच नाही
तांबडं फुटताना दारी कधी आला वासूदेव.... कळलेच नही
रामाच्या मंदिरात कधी सुरू झाली काकड आरती..... कळलेच नाही

शिवपूजनाला बसताना गालावरचे काजळ कधी तोंडभर पसरले.... कळलेच नाही
तरण्या पोरींना घे‌ऊन कधी पारन्या निघालो.....कळलेच नाही
देव चोरताना ताम्हणात कधी सुटली सुपारीची मूठ ...कळलेच नाही
अंगावरची हळद अन.. हातातील कट्यार कधी ओघळली सुटली.... कळलेच नाही
कळलेच नाही कधी तालुक्याच्या गावी सुरू झाले काडीमोड
गावकीच्या जत्रेत भावकीची भांडणे अन एक दोघांचे खून
कळलेच नाहीत
शेता शेतांचे कसे झाले बांध अन.. बांधा बांधांवर कशा आल्या हीरो होंडा
कळलेच नाही, कळलेच नाही
एस. टी. स्थानकासमोर कधी आली चक्री अन सुरू झाला बी‌अर बार
मळीच्या वासाने कारखान्याच्या धुराड्याने पांढरील छेद देत डांबरी सडकेने कसा
साधला डाव कळलेच नाही
कळलेच नाही चावडीवरल्या पेट्रोमक्स वर आले कसे रात किडे
कळलेच नाही
बरवेतला महादेव,वेशीतला मारुती,रानातला खंडोबा, अन गावातला विठोबा
कधी निद्रीस्त झाले कळलेच नाही
टिटवीने साधला डाव, निपचीत पडला माझा गाव
कळलेच नाही, कळलेच नाही

वाटतं कधी कधी मलाही

वाटतं कधी कधी मलाही
मन मोकळं करावं
बंधनाचे पाश तोडून
लांब कुठे उडून जावं.......

वाटतं कधी कधी मलाही
खुदकन हसून लाजावं
'How sweet' म्हणून


कुणीतरी मलाही म्हणावं........

वाटतं कधी कधी मलाही
कोणावर प्रेम करावं
समोरच्याला सगळं दे‌ऊन
आपण मात्र रीतं व्हावं..........

वाटतं कधी कधी मलाही
कोणालातरी जिंकावं
लटका राग,गालावर हसू
आणि डोळ्यातच त्या हरवावं........

वाटतं कधी कधी मलाही
कळी सारखं खुलावं
फुलाच्या त्या सुगंधाने
मन कोणाचं मोहरावं.........

वाटतं कधी कधी मलाही
येत्या पावसात भिजावं
थेंबांच्या त्या साक्षीनेच
कुणीतरी आपलं वाटावं.........
- रसिका

अजून एक रात्र

अजुन एक रात्र
तुझी वाट पाहत जागणार,
आज नक्की येशिल,
असं मन माझं सांगणार..

मग मी कागदांवरच्या
शब्दांमधे हरवणार,
रोज एक कविता करून
रोज एक चुरगाळणार..

आत कुठेतरी माहीत असतं,
तू नाही येणार कधी,
पण मन माझं वेडं आहे
कोण ह्याला समजावणार?
पापण्या जरी मिटल्या,
तरी तास तास मी जागणार,
अजून एक रात्र,
तुझी वाट पाहत राहणार..
- मंदार

माझा वेडा पा‌ऊस

माझा वेडा पा‌ऊस
तो पा‌ऊस,
ज़ेव्हा मला भेटला होता ना ,
तेव्हा तो वेडा नव्ह्ता आणि ....
माझाही नव्ह्ता..
तो ,ढ्गांच्या गडगडाटाशिवाय,
आणि भेदरवणा-या वा-याशिवाय कोसळ्णारा,
एक साधा सरळ पा‌ऊस होता...

एकदा त्याने मला भिजवायचं ठरवलं,
मग मीही भिजायचं नक्की केलं!
तशी छ्त्री होती ना सोबतीला..
पण तीचा कधी उपयोग होतो का?

मग तो पा‌ऊस आधी वेडा झाला..
कारण तो थांबायला विसरला..
आणि मग तो माझा झाला
कारण मी मलाचं विसरून भिजत राहीले

भेटायचयं का तुम्हाला त्याला...?
कधी आलातं तर..
त्याच्यासाठीचं बांधलेल्या..


माझ्या मनाच्या चंद् मॊळी घरातं..
बरसताना दिसेल तुम्हाला.....माझा वेडा पा‌ऊस!!!
-विभावरी